Saturday, February 29, 2020

श्रीमहालक्ष्मी (+)
धन किंवा ज्याला पैसा म्हणतात त्याची अधिष्ठात्री देवि म्हणजे महालक्ष्मी हे आपण मागच्या लेखात बघितलं आहे. धन म्हणजे रोख रक्कम किंवा बोलीभाषेतला पैसा इतकी मर्यादीत व्याख्या माणसाने केलेली असली तरीही पूर्वासुरींनी महालक्ष्मी ही देवता ऐश्वर्यसंपन्नतेशी जोडलेली आहे. त्यामुळे धन (रोख रक्कम), सोनंनाणं, संपत्ती, चलअचल प्रॉपर्टी, समाजातील मानमरातब, सुप्रतिष्ठा, ताकद, सत्ता, मांगल्य, उत्तम आरोग्य आणि मुख्य म्हणजे संपत्तीचा सर्वांगिण उपभोग घेण्याची मानसिक व शारिरीक सुसंपन्नता ही या एकाच देवतेच अन्युस्युत आहे. तिला #श्री अशी संज्ञा आहे. श्रीसूक्ताची फलश्रुती असलेल्या लक्ष्मीसूक्ताचा शेवटही
श्री॒वर्च॑स्य॒मायु॑ष्य॒मारो᳚ग्य॒मावि॑धा॒त् शोभमानं मही॒यते᳚ ।
ध॒नं धा॒न्यं प॒शुं ब॒हुपु॑त्रला॒भं श॒तसं॑वत्स॒रं दी॒र्घमायुः॑ ॥असा आहे
म्हणजे या एकाच ऋचेत ऐश्वर्यापासून सत्ता, धनधान्य, पशुधन, बहुत पुत्रांचा लाभ, संतती आणि शंभर वर्षाचे दीर्घायुष्य असा उल्लेख केलेला आहे हे लक्षात घ्या. आपण पुढच्या काही लेखांमध्ये श्रीलक्ष्मीदेवीच्या अनेक स्तोत्रांचा उल्लेख करणार आहोतच. पण त्या अगोदर श्रीलक्ष्मीच्या गुणधर्माचा परिचय आपण हळूहळू करुन घेणार आहोत...
१) धन किंवा पैसा हे प्रामुख्याने सुखाची साधने व विनिमयाची साधने खरेदी करण्याचे एक प्रयोजन आहे. एक माध्यम आहे हे ध्यानात घ्यावे. म्हणजे साध्य हे सुखाची साधने, गाड्याबंगले, वस्तु हे असून ते मिळविण्याचे साधन म्हणजे पैसा आहे. गोंधळ हा होतो की आपल्यापैकी बरेचजण पैशालाच साध्य समजून पैशामागे जीव तोडून लागतात आणि तिथे गोष्टी फिस्कटतात. पैसा हा अत्यावश्यक आहेच पण ते साध्य नाही...ते फक्त साधन आहे. ज्याप्रमाणे एखादा आवडीचा मिल्कशेक प्यायला काचेचा ग्लास लागतो, तो अतिशय महत्वाचा असतो हे मान्य पण त्यापेक्षाही महत्वाचा आहे तो त्यातून प्यायला जाणारा मिल्कशेक...मिल्कशेककडे दुर्लक्ष करुन तुम्ही फक्त काचेचा ग्लासच कवटाळून बसाल तर चालणार नाही. तेव्हा साध्य आणि साधन यातला फरक लक्षात घ्या...आपल्याला साध्य बरीच गाठायची आहेत. साधन फक्त वापरायचे आहे...साधनाला बंदिस्त करुन ठेवाल तर ते चालणार नाही...
२) #न_मागे_तयाची_रमा_होय_दासी हे एक गंमतीशीर सुभाषित आहे आणि ते शब्दश: खरं आहे बघा...कोणत्याही गर्भश्रीमंत माणसाकडे बघा. तो श्रीमंत असतो पण तो उद्योगी असतो. तो निरनिराळ्या प्रोजेक्टविषयी गप्पा मारेल, तो निरनिराळ्या विषयांचा उहापोह घेईल पण तो कधीच पैसा या गोष्टीविषयी बोलताना दिसत नाही. त्यालाही पैसा हवाच असतो हो पण त्याचा उल्लेख तो कटाक्षाने टाळतो...त्याच्या विचारानुसार, उद्योग हा महत्वाचा असून पैसा हे त्या उद्योगाचे Byproduct आहे. उद्योग केल्यावर, तो यशस्वीपणे आणि मेहनतीने चालविल्यानंतर पैसा हा मिळणारच,जाईल कुठे? फक्त पैशाची हाव किंवा पैशामागे हात धुवून लागाल तर पैसा अजिबात मिळत नाही. तेव्हा आजपासून बोलताना, चर्चेत पैशाचा उल्लेख टाळा...सुखाच्या साधनांविषयी बोला, उद्योगाविषयी बोला, नव्या प्रोजेक्टविषयी गप्पा मारा, नोकरीत असाल तर नोकरी बदलण्याविषयी चर्चा करा, नव्या ऑपोर्च्युनिटीज बघा...पैसा सोडून बाकी विषयांवर गप्पा करा....पैसा हा येईलच, श्रीलक्ष्मी येईलच फक्त जो तिच्या मागे धावत नाही त्याच्या मागे ती येते हे विसरु नका...
३) कायम रॉयल व्यक्तिमत्वांचे आदर्श समोर ठेवा. जे खऱ्या अर्थाने श्रीमंत आयुष्य जगतात अशांकडे बघा..जमिनी विकून गाड्या उडविण्याऱ्या गुंठामंत्र्यांचे आदर्श ठेवू नका, आणि करोडॊ रुपये ढुंगणाखाली ठेवून भुकेकंगलासारखं फालतू आयुष्य जगणाऱ्या कवडीचुंबकांचेही आदर्श ठेवू नका...गर्भश्रीमंत, उद्योगी, बुध्दीमान, उत्कृष्टपणे पैशाची गुंतवणूक करणारे, रॉयल लाईफस्टाईल जगणारे, मितभाषी, व्यसनांना स्वत:वर हावी होऊ न देणारे, चारित्र्यसंपन्न, देखणे, उत्तम ड्रेसिंग सेन्स असणारे, पैशाचा उत्तम विनियोग करणारे, सिलेक्टीव्ह गोष्टींची आवड असणारे, पैशाचा बडेजाव न मिरवणारे, मृदू, ऐश्वर्यसंपन्न, आधुनिक लाईफस्टाईल जगणारे, रसिक वृत्तीचे असे जे कोणी आहेत त्यांचे आदर्श समोर ठेवा...चंदनाचे संगे तरुवर चंदन या उक्तीप्रमाणे हे वर उल्लेख केलेले गुण स्वत:मध्ये कसे येतील ते बघा...ऐश्वर्यसंपन्न आयुष्य आपोआप जगायला सुरुवात कराल तुम्ही....
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
(क्रमश:)

Friday, February 28, 2020

ऐकावे संगीत करावे वाचन 
  जावे फिरायला कधी कधी ...
ध्यानस्थ बसावे करावे चिंतन
   राहावे वर्तमानी सदाकाळी...
छंद एक हवा ठेवा समाधान
  औषध नामस्मरण सर्वांवरी ...
करावा व्यायाम राहावे प्रसन्न
तुलना स्वतःची स्वत:शी बरी ..
ताण जाईल क्षणात पळून
कराल ही उपाय थोडेजरी ..




सूचना -- ही कविता कुणाची  आहे हे माहित नाही ..आवडली म्हणून share केली .कवीचे आभार .

मराठी राजभाषा दिन ..२७ फेब्रुवारी२०२०


Wednesday, September 26, 2018

मनाची प्रार्थना

ही माझी प्रार्थना आहे.. माझी स्वतःची.प्रार्थना प्रार्थनेत कीती सामर्थ्य असतं हे मी जाणतो आणि म्हणूनच मी मनापासून ही प्रार्थना रोज करतो. या पृथ्वीवर माझे आगमन अकस्मात झालेले नाही काही निश्चित उद्देशाने माझी निर्मिती झालेली आहे माझ्यात माझी स्वतःची काही वैशिष्ट्ये आहेत जी मला पूर्णपणे माहिती आहेत माझ्या जीवनात मी माझ्या वैशिष्ट्यांचा पुरेपूर उपयोग करीत आहे काही विशिष्ट कार्य करण्यासाठी माझे ध्येय निश्चित आहे मी काय मिळवू इच्छितो आणि काय देऊ इच्छितो याची मला पूर्ण कल्पना आहे मला हेही माहीत आहे की यशामुळे सुख लाभते आणि सुखामुळे मनशांती मी रोज कुठल्या ना कुठल्या बाबतीत यशस्वी होत आहे मला रोज अनेक प्रकारे सुख मिळत आहे मला रोजच मनःशांती लाभते मला प्रसन्नतेचे वरदान असल्यामुळे मी नेहमी प्रसन्न राहतो आणि प्रसन्नता पसरवितो

Thursday, August 27, 2015

पु.ल. च एक सुंदर पत्र

या पत्रात पु लं सगळ्या आयुष्याचं सार सांगून जातात. आपण जगायला का आलो इथपासून ते आयुष्याचा सर्वोत्कष्ट बिंदू इथवर ते सारं सांगतात.या पत्राचं निमित्त ही तसं वेगळं आहे. पुलंचे नातेवाईक, चंदू ठाकूर हे लष्करात – हवाई दलात होते. त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं. अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं. त्याचंच हे उत्तर.
--------------------------------------------------------------------------------------
> १० जुलै १९५७, -
> प्रिय चंदू
> रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि मी रेडिओतून एक संगीतिकेचा कार्यक्रम प्रोड्यूस करून आताच घरी आलो आहे. तुझे पत्र वाचले. सुनीता सातार्‍याला बाबांकडे गेली आहे. वास्तविक पत्र तिला आहे पण तुझ्या पत्राला उत्तर लिहावेसे वाटले म्हणून उत्तर लिहायला लगेच बसलो. मला गेल्या कित्येक दिवसांत शांतपणे स्वस्थ बसायला फुरसदच मिळाली नाही. हा ऑपेराच घे. गेले आठ दिवस मी राबतो आहे. आज ९ ३० ते १० हा कार्यक्रम झाला. स्वर हवेत विरून गेले. मला फक्त थकवा उरला आहे. मी विचार केला – फक्त थकवा च उरला आहे का? वास्तविक विचार केलाही नसता. लाथ मारून वळकटी उघडली असती आणि घोरायलाही लागलो असतो. पण तुझ्या पत्राने थकलेल्या अवस्थेतही विचार करायला लावले. आणि जसजसा विचार येईल तसतसा मी लिहिणार आहे. किंवा पेन आणि कागदाच्या सहाय्याने विचार करणार आहे.
> तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय? जुन्या लोकांनीही हा प्रश्न विचारून घेतला आहे. कस्त्वम? कुत: आयात:? तू कोण आहेस? कुठून आला आहेस? पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आला आहेस हा प्रश्न महत्वाचा आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच. पण तू कशासाठी आला आहेस? हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं; ते तुझ्या पत्रामुळं तुलाही लाभलं आहे, असं मला वाटलं; ते धन्य आहेत. हा महान प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो. तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत:चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर त्याला अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो. पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे, अशा अहंकारानं जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते ते इथेच.
> तू तुझ्या पत्रात अखिल स्त्री जातीला अत्यंत हीन लेखून मोकळा झाला आहेस. बायका मूर्ख! का – तर तुला त्यांच्यात अजिबात अर्थ आढळत नाही. पण अशाच तुला मूर्ख वाटलेल्या बाईचं छोटं पोर पाहिलं आहेस न तू? त्याचं ती सर्वस्व आहे कारण त्याच्या सुखदु:खाशी तिच्या इतकं कोणी रममाण झालं नाही. आणि माणसाला काय हवं असतं ठावूक आहे? स्वत: शी एकरूप होणारं दुसरं कोणीतरी! काय भयंकर अहंकार आहे नाही? तुझ्याशी स्वत:चं ‘स्व’त्व विसरून आपलं सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती हवी आहे. पण तू असा विचार केला आहेस का? तू कुणाच्यात तुझा ‘स्व’ अर्पण करायला तयार आहेस का? निर्मम होऊ शकतोस का? नाही! तू होऊ शकत नाहीस. मी होऊ शकत नाही. होऊ शकतात फक्त स्त्रिया. ज्यांची तुला अजून ओळख पटली नाही.
> तुझी आई पहा. ती आप्पांसाठी जगते. तिला वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही. सुनीता स्वतंत्रपणे खूप गोष्टी करु शकली असती. तिच्यात असामान्य बुध्दीमत्ता आहे. पण तिने आपले सर्वस्व माझ्यासाठी ठेवले. माझ्याशिवाय तिला विचार नसतो. इतके आपण पुरुष समर्पणाच्या वरच्या अवस्थेला नाही जाऊन पोहोचत. दु:खे निर्माण होतात ती इथे! तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी देखील ऑफिसमध्ये रोज सोनापुरावरून जातो. अनेकांची अंतिमयात्रा मला दिसते. विचार येतो सारा अट्टाहास यासाठीच का करायचा? लिहायचं – नाटकं लिहायची – विनोदी साहित्य लिहायचं-गायचं – गाणी करायची – कशासाठी? शेवट तर ठरलेलाच आहे. पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात. त्याची गंगोत्री कोणती? त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे. या विचारातून नक्की काही संभवत असेल तर दु:ख! निराशा!. तुला असल्या निराशेने घेरले आहे.
> तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू – कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाही तरी फूल म्हणजे काय असतं? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं. कुणी स्वत:च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते. आणि मग जीवनाला अर्थ येतो.
> हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली. कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील. मला त्याचं दु:ख वा आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे, अपूर्णत्वाच्या जाणीवेचे. आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे. तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा. मी म्हणतो रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास हवा. कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी कळलं आहे? आईला पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला जन्मल्यापासून ती देत येते. तू कधी वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का?
> जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. वैताग कंटाळा मलाही येतो. क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ दिसतो. पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते. मनाचा आम्ल झडतो. तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की – डिकन्स – शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल!
> लग्न जरूर कर पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत असावी. तिला ते नाहीतर संगीत यावं. पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत हं. अगदी खऱ्या तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव. ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवील आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते. परमेश्वराची ही अगाध कृती आहे. साऱ्या जिवीताची जी प्रेरणा आहे, ती स्वत:ही हे पुष्कळदा विसरते आणि वेड्यासारखे वागते. हे दुर्दैव आहे. तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही साहजिक आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified. My dear boy, whose deaths are justifiable?
> माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे वडील अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या आधी हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का? ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे. जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात. तुझं पत्र मी सुनीताला पाठवीन. तिचं उत्तर तुला येईलच. १२ वाजत आले. आता थांबतो.
कळावे,
>
> भाई

Monday, June 29, 2015

किशोर पवार यांचा लेख..

कोकण युवा साहित्य परिषदेच्या अधिकृत पेज वर हा पहिला लेख प्रसिद्ध होतोय तोहि थेट दुबईतून पाठवलाय आपले युवा लेखक किशोर पवार यांनी
त्यांचे कार्यकारी मंडळा कडून मन:पुर्वक आभार.
विषय - निरीक्षण.
लिखाणाच माध्यम - मुक्त लेखन.
विशेष - पात्र आणि त्याचं हुबेहूब वर्णन
तो मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात डोक्यावर रुमाल टाकून किती तरी वेळ ताटकळत एस टी ची वाट पाहत थांबलाय पोरा बाळाना शाळेला सुट्टी लागलेय ...गावाकड मेहुनीच बहिणीच नात्यातल कुणा कुणाच लग्न निघालय म्हणून चिक्कार लोक रस्त्यावरच्या उजाड मोकळ्या ढाकळ्या बस थांब्यावर बायको पोर आणि ब्यागा सांभाळीत नेमका लाल डब्बा कधी येईल त्याची वाट पाहतात ..लांबून एस टी येताना दिसली कि घर धनी जरा पुढ होऊन बोर्ड काय डोकावतो ते पाहत परत मोबाईल काढीत टाईम पाहतो ...लहान लेकर बाळ मात्र शेट्ट उन्हाला भेत नसत्यात गावला जायचं म्हणाल्या वर एक तर रात्रभर ती झोपतच नाहीत ..सकाळी सगळ्या अगोदर उठून बस्त्यात ..त्या मूळ उन बिन त्यांना काय लागत नसत ..गावाला जायची हौस कडक रखरखीत उन्हा वर हि मात करते ...समोरून ऐटीत जाणारे कार वाले पाहून बाया बापड्या उगाचच मनात चरफडत आमची जिंदगानी एस टी ट्रक नि काळ्या पिल्या जीपड्या झालच तर सहा सीटर च्या डुगडुगीतच चाललेय म्हणून मनात बापाला शिव्या देत कुणाच्या गळ्यात बांधलेय म्हणत साडीत जास्तच उकडतंय म्हणून चरफडतेय ...तो शांत पणे तिथल्या प्रत्येक प्रवशाला न्याहाळतोय ...तितक्यात त्याला हावी ती एस टी आली एकदाशी ..आपली स्याक सांभाळीत तो एस टी त प्रवेश करता झाला ...हातातील पंच दांडी वर ठोकीत कंडक्टर पुढे चला पुढे चला चा सवई प्रमाणे जय घोष करीत होता ...तो मात्र तिथेच थांबला ...लाहान पणी तो जाळीतून ड्रायव्हरला न्याहाळत आसे ...तो जसा स्टेअरिंग फिरवेल तसा मनातून हा हि फिरवे अगदी हात फिरवत असे ...समोरून भरदाव येणारी गाडी जणू आता येऊन कोपर्याला ठोकेल असे वाटत असतनाच भुर्कन ती बाजूने निघून गेली कि ह्याच्या पोटात आलेला गोळा शांत होई ..
आता जरा जाणता झालाय पण एस टी तली वेग वेगळी माणस खेटून बसणारी जोडपी ...एखाद्या पर पुरुषाच्या बाजूला एखादी स्त्री किंवा मुलगी बसली कि असल्या जळजळीत उन्हात हि गरावा अनुभवणारी पुरुष मंडळी.. त्यात गाडी चालू असताना हि आपली चामडी पिशवी सांभाळीत तिकीट देणारा मास्तर त्याचा तो टाक टाक वाजणारा पंच ..तिकीट देऊन झाल्यावर जागेवर बसल्यावर स्क्रू फिरवून गोल खाच्यात अडकून राहिलेलं काउंटर तिकीट घडी झालेले कोपर्यात दुमडलेल्या नोटा सरळ करीत सफाईदार पणे त्या नेमक्या रीतीने लावून ५०० १०० नंतर पन्नास आसे गट्टा करून वरच्या खिश्यात लीलया कोंबण्याची पद्धत ...सगळ्यात कुतुहूल त्याला त्याच्या किलोमीटर शिट च नेहमीच मास्तर किती सुवाच्छ अक्षरात बारीक रकान्यात आकडे मोड लिहीतात त्या पेपरची घडी हि किती सुंदर असते नाही ..आयुष्याच्या पटलावर वर हि त्याची बेरीज वजाबाकी तो अशीच सुबक पणे मांडीत असेल काय जगण अधिक सोप करीत अशीच त्याची छान घडी करून संसाराचा हिशोब मांडीत असेल काय ...
तसाच तो खांबा जवळ उभा राहिला काही अंतराने मास्तर च्या बाजूचा माणूस उतरणार हे त्याच्या चुळबुळी वरून ह्यांन ताडल होत ..आणि ह्याला मास्तर जवळची सीट मिळाली
त्यान मास्तर ला उगाचच छेडायला सुरवात केली मास्तर जेवायला कुठ थांबणार मास्तर ने हि ठरल्या ठिकाणचे हॉटेल सांगितले ..मास्तर आणि ड्रायव्हर ला तिथे फुकट जेवण मिळत हि खंत त्याला नेहमी असायचीच पुन्हा ती आज जागी झाली ...तो काय मास्तर तिथे नको ह्या हॉटेल ला गाडी थांबवा तिथे मस्त भेटत ...मास्तर म्हणाला नाही आम्ही इथेच नेहमी जेवतो ....बरय ब्वा तुम्हाला फुकट मिळत ..आणि हा थट्टा करीत मिश्कील हसला
मास्तर मात्र खजील झाला राग आलाय आसा एक हि भाव त्याच्या चेहर्यावर न्हवता पण दुक्ख होत
आहो फुकट काय ते एक प्लेट मसूर ची डाळ आणि कडक रोटी ..कित्येक वर्ष हेच खातोय आणि सतत प्रवास करतोय ...
ती होती तोवर घरून डबा यायचा मला पुरण पोळी आवडते म्हणून प्रत्येक सणाला ती पुरणपोळीच बनवायची ...आता घरची साधी पोळी हि नाही भेटत हो ...मास्तर दीनवाणी पणे बोलता झाला
म्हणजे .............
वावंशा चा दिवा म्हणून एकाच मुली वर थांबायचं ठरवलं ती जास्त शिकलेली न्हवती तरी माझा निर्णय तिला मान्य होता आईन न पाठीला पाठ असावी म्हणून थोडा त्रागा केला पण मला एकाच मुलीला चांगल शिकवायचं होत ..मुलगी शिकली हि नाकी डोळी हि सरस ..पण हुंड्या शिवाय कुठे जमत न्हवत स्थळ सांगून यायची पण भरमसाठ मागणी ..मी ह्या हुंडा प्रथेच्या बिलकुल विरुद्ध पण मुलीच वय वाढत होत अश्या परिस्थितीत समाज तुम्हाला गुढगे टेकायला लावतोच प्रत्येक वेळी तुम्ही प्रवहाच्या विरोधात पोहालच असे नाही होत ना ...होती न्हवती ती मिळकत मुलीच्या लग्नात लावली कुठलीच कसर नाही ..त्या नंतर एका वर्ष्यातच बायकोला कर्करोगान पछाडल ..पैसे संपले होतेच मग राहिलेला फंड गावची जमीन तिचे काही दागिने विकून तिच्या आजारपणाची कसरत करू लागलो मी तिच्या वर खूप प्रेम करायचो खूप म्हणजे खूप तिला किमो लागला सगळे केस उडून गेले ऐन पंचेचाळीशित ती जक्ख म्हातारी वाटू लागली मला मात्र ती त्या आवस्थेत हि एखाद्या आप्सरे सरखीच दिसायची ...कर्करोगाशी झुंजत तिने अखेर प्राण सोडला...आणि मी ह्या जगात एकटा झालो पोरका ...
खूप दिवस झाले घरची पोळी भाजी नाही मुली कडे जातो कधी तरी ....पण तिच्या हातची चव कुठेच नाही ...ह्या फुकटच्या जेवणात तर ती अजिबात नाही फक्त पोट भरण ...बस्स
हा सुन्न झाला नि मास्तर बोलत होता तिकीटाची गणित लीलया मांडणारा पेपरची घडी सुरळीत पणे करणारा मास्तर खर्या जगण्यात किती विस्कटलाय ...तिकिटाचा एक रुपया जरी बाकी राहिला तरी मास्तर एक रुपया ढापू पहातोय अशी भावना जपणारा हा आज त्या मास्तर कडे नुसतच शून्यात पाहत होता ...... _/\_
- किशोर पवार
Kishor Pawar
लेखक - वक्ते
Abu Dhabi United Arab Emirates.