Sunday, April 3, 2011

गुढी ..आनंदाची आणि चैतन्याची ..

सर्व ब्लॉगर्स मित्रमैत्रिणींना ,वाचकांना आणि तमाम भारतवासीयांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्च्छा.....

अद्भूत......

क्षणाक्षणाला बदलत जाणारे करोडो चेहर्यांवरचे भाव ,धपापणारे उर ,क्षणात भयाण शांतता तर क्षणात जल्लोष आणि अखेर आत्यंतिक आनंदाने  बेभान झालेला माझा भारत ....!!! प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा वर्ल्ड कप चा अंतिम सामना भारताने जिंकून "जगज्जेता " हा किताब पटकावला .अठ्ठावीस वर्षानंतर विश्वकप भारताला मिळाला आणि तोही सचिन सारख्या महान खेळाडूला समर्पित केला गेला ,हि २०११ या नवीन वर्षाच्या सुरवातीची सगळ्यात आनंददायी घटना आहे ,प्रत्येक भारतीयाला चिरंतन स्मरणात राहणारा अलौकिक क्षण ! .मी १९८३ च्या वर्ल्ड कप विषयी फक्त ऐकून होतो ,पाहीला नव्हता कारण घराघरात दूरदर्शन संच नव्हते आणि क्रिकेटच एवढ लोणही पसरलं नव्हत ,वयही लहान होत ,म्हणून आज विश्वकप जिंकण्याच्या आनंदाचं खूप अप्रूप वाटतय.एक ऐतिहासिक क्षण अनुभवला .धोनी ,हरभजनसिंग आणि युवराजच्या डोळ्यातील आनंदाश्रू  पाहून खरच गहिवरून आलं.कुणाचं लक्ष नाही असं पाहून हळूच डोळ्यांच्या कडा पुसल्या .आत्ता कळलं लोक क्रिकेट साठी एवढ वेड का होतात ते .

    धोनी सेनेचं हृदयापासून अभिनंदन आणि संपूर्ण क्रिकेटवेड्या भारताचं देखील मनापासून अभिनंदन.!!!!
                                                              जयहिंद!!